जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट परिसरातील ’जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर बॉम्बहल्ला करून मोठी कारवाई केली. भारतीय हवाई दलाने केलेल्या या कारवाईत पाकिस्तान सरकार आणि लष्काराने कोणतेही नुकसान झाले नाही, असे म्हटले आहे. मात्र, ’जैश-ए-मोहम्मद’ संघटनेने या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची कबुली दिली आहे.
‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा लहान भाऊ मौलाना अम्मार याने एका ऑडिओ क्लिपमधून या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर दुसर्या दिवशी पेशावरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना मौलाना अम्मारने ही कबुली दिली आहे. अम्मारची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, त्यात ’मर्काज’ (धार्मिक शिक्षा केंद्र) वर बॉम्ब पडल्याचे अम्मार सांगत आहे. भारतीय लढाऊ विमानांनी ’जैश’चे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर त्याने नाराजीही व्यक्त केली. शत्रूंनी युद्ध पुकारलं आहे. भारतीय लढाऊ विमानांनी कोणत्याही एजन्सीच्या मुख्यालयाला लक्ष्य केले नाही. त्यांनी कोणत्याही मुख्यालयावर बॉम्बहल्ला केलेला नाही. काश्मीरमधील मुस्लिमांच्या मदतीसाठी त्यांनी आमच्या केंद्रांवर हल्ला चढवला आहे, असेही अम्मार म्हणाला.